Saturday, 20 August 2016

हत्ती इलो या दीर्घ कवितेवरील कवी अजय कांडर लिखित दैनिक लोकसता मधील संकलीत लेख

अजयकांडर, रविवार, ११ डिसेंबर २०११ ajay.kandar@gmail.com शब्द पब्लिकेशनतर्फे अजय कांडर यांची ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लवकरच प्रसिद्ध होत आहे. ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. तसेच या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं. मा झ्या पहिल्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहानंतर सुमारे सात वर्षांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता प्रसिद्ध होत आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणारी ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. ‘ऐवजी’, ‘मुरळी’ अशा वाङ्मयीन नियतकालिकांमधून ‘हत्ती इलो’चा काही भाग आधी प्रसिद्ध झाला आहे. त्या वेळी जाणकार वाचकांनी, समीक्षकांनी या कवितेबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या. यातूनच ‘शब्द पब्लिकेशन’ने हा संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. खरं तर मराठीत नव्वदोत्तर पिढीत दीर्घ कविता मोठय़ा प्रमाणात लिहिली गेली. मात्र, हा त्या वेळचा प्रवाह ओलांडून मी ‘हत्ती इलो’चे लेखन केले आहे. अर्थात, यामागे निश्चित भूमिका आहे. ‘आतला आवाज साद देतो’ तेव्हाच लेखकांनी लिहायचं असतं असं म्हणतात. ‘हत्ती इलो’चं लेखनही असंच झालं असावं, असं मला वाटतं! २००५ मध्ये ‘आवानओल’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. सर्वदूर पसरलेल्या खेडय़ांतील कष्टकरी बायांच्या वेदनेच्या गाजेचा प्रतिध्वनी ‘आवानओल’मध्ये आपल्याला ऐकू येतो. कष्टकरी बायांचं चित्र मराठी कवितेत तसं नवं नाही; परंतु तळकोकणातील कष्टकरी बायांचं ‘लोकजीवन आणि भोगजीवन’ तिच्या बोलीसह मराठी कवितेत प्रथमच वाचकाला वाचायला मिळालं, असं त्या वेळी अनेक वाचकांनी सांगितलं. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह मराठीतील अनेक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित पुरस्कार या संग्रहाला त्या वेळी प्राप्त झाले. या संग्रहातील कविता विविध अभ्यासक्रमांसाठी निवडल्या गेल्या. विविध भारतीय भाषांत ‘आवानओल’मधील कविता भाषांतरित केल्या गेल्या. विविध अभ्यासकांनीही स्वतंत्रपणे ‘आवानओल’मधील कवितेवर लेखन केलं. हे सांगायचं कारण हेच की, असं यश प्राप्त झाल्यावर आधीच्या मानसिकतेतून तशा प्रकारची कविता पुढे लिहिणं सोपं जातं. मात्र जाणीवपूर्वक अशा प्रकारची कविता लिहिण्याचं टाळून मी ‘आवानओल’नंतरच्या कवितेत सामाजिक आणि राजकीय पर्यावरणाचा- पर्यायानं कोकणची प्रादेशिकता ओलांडून एकूण बदलत्या समाजजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचं लेखन होय! कलावंत कलेच्या माध्यमातून विकसित होत असतो, तेव्हा त्याची मुळं महत्त्वाची असतात. ज्या जमिनीत आपण पीक घेत असतो त्या जमिनीची अधिकाधिक मशागत होते तेव्हाच चांगलं पीक येतं. माझी आधीची कविता खेडय़ांतील भेदक वास्तव समोर ठेवत असल्यानं त्यानंतर लिहिली गेलेली कविता खेडय़ांतील पूर्वसंस्कार पचवत खेडं आणि शहर यातील जगणंच उद्ध्वस्त करणारी लिहिली गेली आहे. मराठीत दीर्घ कविता माझ्या पिढीत याआधी सातत्यानं लिहिली गेली असली तरी विशिष्ट प्रदेशाच्या लोकजीवनावर आघात होऊन ते लोकजीवनच संपुष्टात आल्याची तीव्र वेदना प्रथमच ‘हत्ती इलो’ या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. अर्थात, समकालाचा मागोवा ही कविता घेत असल्यानं ती या ठरावीक लोकजीवनाला ओलांडून अनुभव आणि जाणीव-नेणिवेच्या पातळीवर व्यापक होत जाते. त्यामुळे वाचकाला ती समग्रपणे भिडून आतून ढवळून काढेल, असाही विश्वास वाटतो आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वत्र राजकीय आणि सामाजिक बदल झाले. मात्र, तळकोकणाची भूमी या सगळ्या बदलांना संयमितपणे सामोरं जात शांतच राहिली. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गांधीविचारांची मुळं तळकोकणात खोलवर रुजलेली होती. तर बॅरिस्टर नाथ पै यांच्या सारखा कलासक्त, चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेला नेता याच भूमीतला. नाथ पै यांचे विचारधन घराघरांत पेरले गेल्यामुळे इथला माणूस तसा विचारशीलच. त्यामुळेच इथे गेली २५ वर्षे नाथ पैंच्या विचारांचा वारसा घेऊन, लोकसभेची निवडणूक लढवून पाच वेळा निवडून येणारे तत्त्वनिष्ठ नेते प्रा. मधू दंडवते यांच्या समाजवादी विचारांतून तळकोकणात समाजवादी वातावरण तयार झालेले. स्वातंत्र्यानंतर पुढील ४० वर्षे हेच वातावरण राहिल्याने कोकणात राजकीय संघर्ष असा झालाच नाही. परिणामी इथली समाजव्यवस्था शांततेतच शाबूत राहिली. मात्र ९० च्या दशकाच्या प्रारंभी इथल्या राजकारणाचे भगवेकरण झाल्याने आणि त्यामुळे समाजवादी विचारांखाली दबून राहिलेल्या तरुणाला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याने, इथल्या घराघरांतल्या चुलीत राजकारण शिजू लागले. त्यातूनच कोकणच्या बदलत्या समाजजीवनाला प्रारंभ झाला. ‘हत्ती इलो’चा प्रारंभ अशा संयमित आणि विचारशील समाजव्यवस्थेचा वेध घेत असल्यानं ही कविता समजाचं, एका काळाचं चित्र प्रतिबिंबित करीत जाते. यातून विशिष्ट प्रदेशाचा इतिहास, विशिष्ट पिढीवरचा एखाद्या काळाचा संस्कार वाचकाच्या मनात उमटत राहील. परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या राजकीय संयमी जीवनाकडेही ‘हत्ती इलो’ ही कविता निर्देश करते. स्वातंत्र्यानंतर समाजजीवन उंचाविण्याचं स्वप्न अनेक नेत्यांनी दाखविलं. या लोकनायकांनी समाजजीवन उंचावलेही. मात्र या अशा लोकनायकांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या मुशीतून तयार झालेले ‘लोकनेते’ पुढे मात्र पार बदलून गेले. इथूनच समाजाच्या वैचारिक व सामाजिक अधोगतीला प्रारंभ झाला. नव्वदच्या दशकात कोकणचं राजकारण अशा स्थितीतून ढवळून निघालं आणि इथे पूर्णत: हिंदुत्वाची लाट आली. ही लाट विजयाच्या शिखरावर पोहोचल्यामुळे यश मिळूनही ते न पचविता आलेल्या व्यवस्थेची जी स्थिती होते, तोच अनुभव या राजकीय व्यवस्थेतून इथल्या समाजाला घ्यावा लागला. या संदर्भातील ‘हत्ती इलो’ कवितेतील पुढील ओळी आपल्याला अधिक प्रचीती देतात. जिथे हत्तीलाच मिळालं संरक्षण तो असताना बंदुकीच्या निशाणीवर दिला त्याला कुणी आधार, वाचविले त्याचे पंचप्राण तिथेही त्याच्या स्वप्नातील उन्मादाची रग उसळत राहिली आणि ज्या उन्हात आली सावली माऊली होऊन ज्या कडय़ाकपारी झाल्या मायबाप तिथल्या परंपरेचं संचित उद्ध्वस्त होताना प्रसंगी स्वत:च उद्ध्वस्त करताना तो डोळ्यांत आसुरी आनंद साठवत राहिला क्रूरपणे! आजच्या सत्ताधारी व्यवस्थेचं असं चित्र लक्षात आल्यावर अंतर्मुख व्हायला होतं. तर दुसरीकडे मूल्यऱ्हास सर्वत्र होत आहे. सांस्कृतिक क्षेत्राचं अध:पतन, सामाजिक जीवनाच्या मूल्यांची सरमिसळ आणि व्यक्तिवादी विचारधारा ही सद्य:स्थितीत अधिक बळावली आहे. याच्या मुळाशी गेल्यास एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पूर्वी माणूस सार्वत्रिक जीवनाशी आपलं जगणं जोडून घेताना आधी समाजाचा विचार करीत होता. आता तो समाजाला स्वत:च्या केंद्रस्थानी ठेवत आहे. ही विलासी वृत्ती एकूण समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारी असून, या सर्वावर स्वार झाली आहे ती सत्ताधारी व्यवस्था! जिथल्या-तिथल्या सत्ताधारी व्यवस्थेतून अविचारांची बीजं रुजत असल्यामुळं तत्कालीन राजकीय व्यवस्थेबरोबरच एकूण समाजच बधीर झालेला आपल्याल आढळतो. ‘हत्ती इलो’ या कवितेत याचं प्रभावी चित्र मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.समाजातील मने दुभंगत जातात तेव्हा त्याचा फायदा राजकीय व्यवस्थेलाच होत असतो. आणि या व्यवस्थेचा फायदा घेत राजकीय एकाधिकारशाही जन्म घेत असते. यातून मग एकाधिकारशाही असलेल्या राजकीय व्यवस्थेला आपल्या मनासारख्या घटना सहज घडवून आणता येतात. राजकारणाच्या असंस्कृतपणामुळे समाजजीवन उद्ध्वस्त झालंच; परंतु प्रत्येक माणसाला स्वत:चा हक्क शाबूत ठेवण्याचा अधिकारही उरलेला नाही. ‘हत्ती इलो’ ही कविता नेमकेपणानं यावर बोट ठेवते. आज आपण घटनेनुसार व्यवस्था राबवत असलो तरी घटनेनं बहाल केलेले नियम राज्यकर्त्यांकडून पाळले जात नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे अनुभव आपण वारंवार घेत असतो. माणसांना आपल्या साध्या साध्या हक्कासाठीही झगडावं लागत आहे. त्यांचा आवाज दबला जातोय. या आवाजाचं पालकत्व ज्यांनी स्वीकारायला हवं, तेच आज लोकशाहीच्या मुळावर आलेले दिसतात. त्यामुळे माणसं एका अविश्वसनीय जगात जगत असल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालं आहे. या अविश्वसनीय चित्राचा उद्गार म्हणजे ‘हत्ती इलो’ ही कविता! गणगोत आणि नाती जपली जातात तेव्हा आपलेपणाचं स्नेहमय वातावरण समाजात तयार होत असतं. मात्र नात्याचे पाश तोडले जात किंवा आपल्याला हवे तेव्हाच जपत, त्यांचा आपल्याला हवा तिथे वापर व्यवस्थेसाठीही करता येतो, अशी वृत्ती राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत वाढत जात आहे. त्यामुळे सत्तेचं नवं आमिष दाखवून कुठलीही सत्ता समाजातील नातेसंबंधावर कशी घाव घालते आहे, याबाबतचे संदर्भही ‘हत्ती इलो’ या कवितेत आपल्याला तपासता येतात. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निकोप अभिसरण व्हायला हवं. मात्र या तिन्ही व्यवस्था ज्यांच्या हातात आहेत, त्यांना त्याचा एकमेकांशी काय पूरक संबंध असतो, किंवा समाजातील प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याचं काय स्थान असतं, हेच माहीत नसल्यानं समाजातील प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासावर दूरगामी परिणाम वर्षांनुवर्षे होताना दिसत आहेत. अशा परिणामांचे प्रतीक म्हणूनही ‘हत्ती इलो’ या कवितेकडे आपण पाहू शकतो! या कवितेत व्यक्त झालेला सांस्कृतिक ऱ्हासही मला महत्त्वाचा वाटतो. ‘हत्ती इलो’ या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं. सांस्कृतिक विचार हा आजूबाजूच्या पर्यावरणातून आपल्याला मिळत असतो. तसा तो मूलत: आपल्यात नैसर्गिकच आत दडलेला असतो. फरक एवढाच असतो की, आपल्या सांस्कृतिक विचाराला जो माणूस अधिक चालना देतो तो सांस्कृतिकदृष्टय़ा व्यक्तिगत पातळीवर अधिक घडत जातो. आणि त्यातून तो विचारशील होतो. याचा अर्थ असा की, कुठलाही विचारशील माणूस आधी सांस्कृतिकच असतो. मात्र, आजच्या समाजव्यवस्थेत अशा विचारशील माणसाकडूनच अविचारी कृती घडत असल्यामुळे समाजाच्या मूळच्या अपप्रवृत्तींना अधिक बळकटी मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही काळात अशी अपप्रवृत्ती बाळगणारी राजकीय व्यवस्था विचारशील माणसाला आपल्या गोतावळ्यात घेऊन आपली बाजू अधिक सक्षम करीत राहते. यातून एकूणच समाज सांस्कृतिकदृष्टय़ा रसातळाला जात राहतो. ‘हत्ती इलो’ या कवितेत या सर्वाचा वेध घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कृती ही जबाबदारीची आणि प्रगतिशील असली पाहिजे. अशा कृतीतून जात-धर्माच्या पलीकडे एकूणच मानवी मूल्यांच्या आधारावर समाजव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असते. मात्र, आपल्या बहुजातीय आणि बहुधर्मीय देशात अशी सांस्कृतिक कृती अधिक गरजेची असताना आपण सांस्कृतिक परंपरेच्या सनातन चौकटी मोडून काढू शकत नाही. या मानसिकतेचाही मागोवा ‘हत्ती इलो’मध्ये घेण्यात आला आहे. सध्या कोणाला विचारशील म्हणावं, अशा संभ्रमाच्या काळाला आपण सारे सामोरे जात असून, व्यक्तिगत फायद्यासाठी अशा तथाकथित विचारशील व्यक्तीनेच समाजजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या तथाकथित महान व्यक्तीचं चरित्र लिहिल्याच्या कथाही आपण अनुभवत असून, यावरही ‘हत्ती इलो’ कविता भाष्य करते. ‘हत्ती इलो’ या कवितेला कोकणचं पर्यावरण लाभल्यामुळं तिच्यात कोकणचं भावजीवन, राजकीय आणि सामाजिक संघर्ष येणं स्वाभाविकच होते. परंतु कोकणचा निसर्ग आणि त्याचा ऱ्हास मांडताना तिथल्या लोकजीवनाला चिकटून आलेल्या कोकणच्या बोलीचा चपखलपणे वापर केलेला आढळेल. कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं, असं मी मानतो. त्यामुळे माझी कोणतीही कविता माझ्या जगण्यासह माझं आजूबाजूचं पर्यावरण मांडते. पेशाने पत्रकार असल्याने कोकणचं राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर उघडय़ा डोळ्यांनी पाहिलं आणि माझ्यात एक माणूस म्हणून नेहमीच अपराधीपणाची भावना कायम टोचू लागली. कारण काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेनं कोकणचं रूपडंच पालटून टाकलंय. माणूस माणसापासून पारखा झालाच; परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला. अर्थात, याला एकच राजकीय विचारधारा कारणीभूत नव्हती तर संधीसाधूपणातून सर्वच राजकीय विचारधारा अशा घटनेला कारणीभूत ठरल्या असल्याचं लक्षात येतं. माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून मी जेव्हा या सर्वाचा तटस्थपणे विचार करतो तेव्हा तीव्रतेनं एक गोष्ट लक्षात येते, ती ही की, आता माणसाचा माणसावरचा विश्वास उडून गेलाय. परिणामी ‘हत्ती इलो’ या कवितेत कोकणचं हे वातावरण प्रतिबिंबित झालेले आहे. ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लिहिण्याची प्रेरणा मिळण्याला एक घटनाच कारणीभूत आहे. प्रयोगशील नाटय़कर्मी अतुल पेठे कणकवली येथे प्रायोगिक नाटय़चळवळ राबविणाऱ्या ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’साठी नाटक बसवायला आले होते. त्यांनी मला कोकणच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहिण्याचा प्रयत्न करायला सांगितला. या निमित्ताने मी जे चिंतन केलं, त्यातून माझ्या मुळच्याच काव्यवृत्तीला बळकटी मिळाली आणि नाटकाऐवजी ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचे लेखन झालं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमेवर तळकोकणचा भाग येतो. या सर्व भागांत गेल्या काही वर्षांत रानटी हत्तीने उच्छाद मांडला आहे. हाच अनुभव काही वर्षांतील राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतून सार्वत्रिकपणे आपल्याला घ्यावा लागतोय. म्हणूनच हत्तीच्या रूपकातून ‘हत्ती इलो’चं लेखन झालं. या संदर्भातील या कवितेतील अखेरचा काही अंश.. ‘आता हत्ती ज्या भूमीलाच स्पर्श करतोय ती भूमीच नापीक झालीय भूमी र्निवश झाल्याचे दु:ख मनात असतानाच हत्तीने माणसांनाच र्निवश करायला प्रारंभ केला हत्तीच्या गर्जनेने.. ओल्या बाळंतिणीचाही पान्हा सुकू लागला उदरातील गर्भ गुदमरू लागला आता माणसंच मंदबुद्धीची झाल्याची खात्री पटल्यावर हत्ती, एवढा बोकाळला, की त्याने आधी माणसांना गृहीत धरले होतेच, आता माणसेही त्याला गृहीत धरू लागली.. हत्ती आणि माणसाचा असा खेळ हल्ली रोज नव्याने खेळला जातोय, सर्वत्र! गेल्या पंचवीस वर्षातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतन ‘हत्ती इलो’मध्ये मांडण्यात आले आहे. ही दीर्घ कविता विशिष्ट प्रादेशिक जनजीवनाच्या पडझडीचा काळ जसा मांडते त्याचबरोबर त्यातील अंतर्विरोधातील ताणेबाण्यामुळे ती वाचणाऱयांमध्ये वैश्विक भानही निर्माण करते, असे मत ‘हत्ती इलो’बाबत अनेक मान्यवरांनी समीक्षा लेखनातून व्यक्त केले आहे. ‘हत्ती इलो’ या संग्रहानिमित्त कांडर यांची भारत सरकारच्या ‘साहित्य अकादमी’सारख्या शिखर संस्थेवर सदस्य म्हणून पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. तर या संग्रहाला ‘कुसुमाग्रज’, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण, काव्यरत्नाकर, नारायण सुर्वे आदी प्रतिष्ठित आठ काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर संग्रहावर अनेक मान्यवरांनी समीक्षालेखन केले आहे. तसेच त्यावर ‘हत्ती इलो’ याच नावाने नाटक रंगमंचावर आले असून त्यालाही अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

No comments:

Post a Comment