Saturday, 20 August 2016

संत साहित्याचे सामाजिक योगदान- डॉ.रामचंद्र देखणे

संत साहित्याचे सामाजिक योगदान on: May 01, 2016In: रूपगंधNo Comments अध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचार परंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की, सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्‌गार संत ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला. नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींना फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वाूस आकारला. संतांची वाङ्‌मयरचना हे मराठी सारस्वताचे एक अनमोल लोकधन आहे. संतांची भूमिका ही केवळ तत्त्वचिंतकाबरोबर लोकशिक्षकाची आहे. जागल्याची आहे, पूर्वी खेडेगावात आलेले पीकपाणी राखण्यासाठी जागले ठेवत असतं. ते स्वत:ही जागे राहायचे आणि रात्रभर गावालाही जागते ठेवायचे. अज्ञान, अविद्या, विकृती, विकार यांच्या झोपेतून संत स्वत: नित्य जागे आहेत आणि जागल्याची भूमिका येऊन. उठा उठा जी मायबाप। कशी लागली झोप। उठा की जी मायबाप।। असे सांगत सांगत समाजालाही खडबडून जागे करीत आहेत. सामाजिक आणि आध्यात्मिक जागृती हेच संतांच्या वाङ्‌मयीन निर्मितीचे मुख्य प्रयोजन ठरते. संत हे साक्षात्कार होते. त्यांना आत्मानुभूती लाभली होती. एकच आत्मतत्त्व सर्व वास्तूमात्रात भरून राहिल्याने ब्रह्मभाव एका व्यक्तीत सीमीत न राहता साऱ्या विश्वातला कवटाळण्यास सिद्ध होतो. सर्वाभूती हाच भगवद्‌भाव जागा व्हावा, त्यातून परस्पर बंधुभाव, एकात्मता नांदावी ही जगत्‌ उद्धाराची तळमळ त्यांच्या अभंगवाणीतून ठायीव्यक्त होते. स्वत: जीवनमुक्त अवस्थेला गेलेल्या संतांना ही जागृती का घडवायची आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात. उपकारासाठी बोलो हे उपाय। येणेविण काय चाड आम्हा ।। बुडते हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणवोनि ।। जागृती घडविणे हेच प्रबोधनकाराचे खरे कार्य होय. संत हेच श्रेष्ठ प्रबोधनकार आहेत. म्हणूनच कधी विनंती करून, कधी भीती दाखवून, कधी येणाऱ्या गंभीर परिणामांची जाणिव करून देऊन, तर कधी रागावूनसुध्दा ते समाजाला जागेच करीत आहेत. आमच्या उपनिषद दृष्ट्या ऋषींनीही “उत्तिष्ठत्‌ जाग्रत्‌ प्राप्य वरान्निबोधत्‌’ असा उपदेश करून प्रत्येक अवस्थेत जागे रहायला सांगितले आहे. कीर्तन हे तर जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. ईश्व‌री तत्त्वाबरोबरच मानवी मूल्यांना जागे ठेवणे हेच कीर्तनाचे वैशिष्ट्य. संतांनी जागृतीसाठी हेच माध्यम निवडले. बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ, व्यक्ती आणि समाज या सर्वांचा एकत्रित विचार करून मानवी मनाला आणि जीवनाला समृद्धीकडे नेण्यासाठी सावध रहाण्याचा उपदेश केला. तुकोबाराय म्हणतात, सावध झालो सावध झालो। आलो हरिच्या जागरणा ।। संतांची अमृतवाणी हा मराठी शारदेचा अंभग ठेवा आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शद्ब अभंग ठरला आहे. संतांच्या विशाल, पवित्र, प्रशांत, प्रासादिक आणि भव्योदात्त अनुभवाचा तो अमृत अविष्कार आहे. त्यात संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळत आहे. भक्तीप्रेमाबरोबरच समाजप्रबोधनाची तुकोबारायांची तळमळ डोकावत आहे. नामदेवरायांची आर्तता प्रगटत आहे. समर्थांचे लोकीद्धाराचे सामर्थ्य निनादत आहे, तर आध्यात्मिक विचारांबरोबर जीवनमूल्यांच्या संदर्भात घडविलेले नाथांचे उद्‌बोधन आविष्कृत होत आहे. जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतोबा, बहिणाई, कान्होपात्रा या संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त झाला आहे. “स्वान्तसुखाय आणि मार्गदर्शनाय’ या दोन कारणांसाठी प्रगट झालेली संतांची वाणी ही सामान्य माणसाला जीवन जगतानाही विवेकाची वाट दाखवित आहे. त्याच्या जीवनाला आनंदाचे नित्यत्त्व म्हणजेच अमृतत्त्व प्राप्त करून देत आहे. देदीप्यमान संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली. या संतपरंपरेने आपल्या वाणीने आणि कृतीने समाजमनात ज्ञानजागृती, कर्जजागृती करून समाजाला जागत ठेवले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अगोदरही समाजात विद्वान नव्हते असे नाही, पण त्यांच्या ठायी केवळ पांडित्य होते. साधुत्त्व नव्हते. दुसऱ्याला सांगणारे खूप होते; पण तसे अनुभवणारे अभवानेच होते. ज्ञानेश्व र कळवळ्यापोटी आध्यात्मिक विचारांची मांडणी करीत, माध्यमातून खऱ्या विवेक धर्माचाच पाया घातला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेत साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकारी जिज्ञासूंना, भक्तीवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरुपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून प्रापंचिकांना साच आणि मवाळ। मितुळे आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे । अमृतावाणीचा आणि अमृततत्त्वाचा उत्कट आविष्कार घडविला आहे. भागवत धर्माची, भक्तीपंथाची, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची महाराष्ट्र सारस्वतातील विविधांगी वाङ्‌मयरचनेची आचारविचार समन्वयाची आणि सामाजिक समतेची मुहूर्तमेढ करून ज्ञानेश्व र माऊलींनी मूल्याधिष्ठित सांस्कृतिक जीवनाचाच पाया घातला आहे. त्याच पायावर संतविचारांची आणि प्रबोधनाची भव्य वास्तू उभी राहिली आहे. पाया पक्का तर वास्तू उभी राहते. इमारत बांधताना पाया खोल घेतला जातो. कठीण अशा खडकापर्यंत तो न्यावा लागतो. ज्ञानेश्वचर माऊलींनी खडकासारख्या जडत्व असलेल्या जीवांच्या अंत:करणातही भक्तीचा ओलावा निर्माण करून हा भगवद्‌भक्तीचा पाया खोलवर रुजविला आहे. ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा आणि भागवतधर्मांचा पाया घातला. तसे पाहिले तर भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांच्या आधी दोन हजार वर्षे घातला गेला असतानाही तो पुन्हा रचण्याची आवश्यतकता का भासली? जुन्यातले काय घेतले आणि काय वगळले याचा विचार केला पाहिजे. भागवत धर्माचा आधारभूत ग्रंथ भगवद्‌गीता मानला आहे. “श्रुती’ म्हणजे वेद तर “स्मृती’ ह्या वेदावर आधारलेल्या म्हणूनच काही प्राचीन ज्ञानवंतांनी आणि तत्त्वचिंतकांनी मन्वादिकांच्या स्मृतीप्रमाणेच गीतेलाही दुय्यम स्थान दिले आणि ती स्वत: प्रामाण्य नाही असे म्हटले. या विचारांनाच ज्ञानदेवांनी कलाटणी दिली. गीता ही स्वत: प्रामाण्य तर आहेच आहे, पण वेदांचे सार गीतेने सांगितले आहेत. ज्ञानेश्व र महाराज गीतेचे मोठेपण सांगताना अठराव्या अध्यायात म्हणतात हे गीतानाम विख्यात। सर्व वाययाचे मथित। आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ।। ज्या ज्ञानाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते ते वेदांचे सार असलेले ज्ञानच “गीता’ रूपाने प्रगटले आहे. गीतेला वेगळे औदार्य आहे. वेदांचा अधिकार काही वर्णांनाच होता. सर्वांना ज्ञान देण्यासाठी वेद कृपण होता. ज्ञानदेवांनी भक्तीचा अधिकार देणाऱ्या एवढेच नव्हे तर- स्त्रीद्रादि प्रतिभे सामाविले । स्त्रीद्रांना तसेच अज्ञानी, अडाणी अशा जीवांनाही ब्रह्मरसाचा आस्वाद घडविणाऱ्या आणि प्रत्यक्ष भगवंताची उक्ती असणाऱ्या गीतेला आधारभूत मानले आणि गीतेवरचे भाष्य केले. तसे पाहिले तर ज्ञानदेवांचा भागवतधर्म हा गीताधर्म आहे. ज्ञानेश्व र माऊली म्हणतात. मग आर्ताचेनि ओरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे। वर्षला शांतरसे । तो हा ग्रंथु ।। आर्त जनांना दु:खापासून सोडवावे, त्यांच्या जीवनातील दु:खे आणि वेदना शांत कराव्यात या कळकळीने गीतेचा अर्थ सांगण्यासाठी सद्‌गुरूंनी जो ब्रह्मरसाचा वर्षाव केला तोच हा ज्ञानेश्वीरी ग्रंथ होय. “आर्तासाठी गीत आहे’ ही यामागची तळमळीची भूमिका घेऊनच ज्ञानदेवांनी गीताप्रणित भागवतधर्म सांगितला आणि सर्वांच्या जीवनात आनंद ओसंडून वहावा म्हणून सर्वांनाच भक्तीचा अधिकार देणाऱ्या गीतेवर भाष्य करून भक्तीचे द्वार खुले केले. ज्ञानेश्व्र माऊलींनी सारस्वताचा पाया घातला. ओवी, अभंग, गवळणी, विरहिणी ह्या वाङ्‌मय प्रकाराच्या आद्यरचना ज्ञानदेवांनी केल्या आहेत. ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकार जिज्ञासूंना, भक्तीयोग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टान्ताच्या माध्यमातून प्रापंचिकांनासुद्धा आपल्या ज्ञानेश्वपरीच्या अमृतवाणीने वेगळा आनंद दिला आहे. संत साहित्य आणि विचार याविषयी अनेक स्तरावर चिंतन घडले आहे. गेल्या शंभर वर्षात न्या. रानडे, राजाराम शास्त्री भागवत, प्रो. रानडे, राजवाडे, फाटक, पेंडसे, वै.मामासाहेब दांडेकर, ह. भ. प. ल. रा.पांगारकर, आचार्य विनोबा भावे, गं. बा. सरदार अशा अनेक विचारवंतांनी संत साहित्याचा परामर्श घेतला आहे. गं. बा. सरदारांनीया विचारवंतांचे तीन वर्ग सांगितले आहेत. “रानडे यांच्यासारख्यांच्या चिंतनात श्रद्धा व चिकित्सा, राष्ट्रभिमान व राष्ट्रनिष्ठा यांचा बेमालूम मिलाफ झाला आहे. त्यामुळे संतांच्या कार्याचे वैशिष्ट्यच फक्त त्यांनी सांगितले, पण उणीवा दाखविल्या नाहीत. रानड्यांनी भागवत धर्म व महाराष्ट्र धर्म यांचा समन्वय साधला, पण त्यातील विरोधाची मिमांसा केली नाही.’ असे सरदारांचे म्हणणे आहे. दुसरा वर्ग आहे राजवाडे -भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे प्रभुती राष्ट्रवादी लेखकांना संतांचा भक्तिपंथ निष्क्रीयतेचा व नेभळपणाचा वाटला. युरोपचा इतिहास वाचून केवळ राष्ट्रवादाचा विचार करणाऱ्या या मंडळींना संतांच्या कार्यातील आणि वृत्तीतील सखोलता का दिसू नये, हा मोठा प्रश्नय आहे. राष्ट्रवादाचा विचारही मनात रुजवायला धर्मतत्त्वाची डोळस दृष्टी असावी लागते. ही दृष्टी देण्याचे काम संतांनी केले म्हणून तर पुढे राष्ट्रधर्म उभा राहिला. शिवकालीन राजकीय आंदोलकांनी वैचारिक पार्श्वीभूमी संतमंडळींच्या कार्यातून तयार झाली, हे विसरून चालणार नाही. तिसरा वर्ग आहे संत साहित्याकडे व कार्याकडे श्रद्धेने व भक्तीने पाहणाऱ्यांचा. त्यात प्रामुख्याने वै. गुरूवर्य मामासाहेब दांडेकर किंवा ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी संतसाहित्याचा भक्तिभावाने आणि रसिकेतेने परामर्श घेतला आहे. त्यामुळे संत साहित्यातील भक्तीतत्त्वाचे चिंतन मोठ्या प्रमाणावर झाले. संत आणि भक्ती हे अभेद्य नाते आहे, पण संतांची भक्ती ही देवळात, गाभाऱ्यात, सोवळ्या ओवळ्यात कर्मकांडात गुंतलेली नाही. भक्तीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा सिद्धांत त्यांना लोकमनात रुजवायचा होता. ज्ञानेश्व र माऊलींना तर जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चि त । जाण माझा ।। भक्तीयोगाची अशी सरळ सरळ व्याख्या सांगून भक्तीतत्त्वाचे सामाजिक चिंतन घडविले आहे, तर तुकोबारायांनी… विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। असा रोखठोक उपदेश करून भक्तिच्याच माध्यमातून विष्णुमय जग पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. संत एकनाथांचे एक भारूड या संदर्भात महत्त्वाचे वाटले. त्या भारूडात ब्राह्मण आणि महार असा संवाद आला आहे. तो ब्राह्मण एका महाराला विचारतो आहे… “का रे महारा मदमस्ता ।’ त्यावर तो महार सांगतो, “कां हो ब्राह्मण बाबा भलतेच बोलता।’ त्यावर रागावून तो महार सांगतो, “तुझ्या बापाचे भय काय…।’ आणि महाराच्या मुखातून स्वत: नाथ महाराज सांगतात, “मायबाप तुमचे नि आमचे एकच हाय…’ आजच्या सामाजिक स्तरावरील समतेचा विचार करताना सामाजिक तत्त्वचिंतानाचा आद्य प्रवाह संतांच्याच आध्यात्मिक तत्त्वचिंतनातून उदयास आला आहे. संतांनी आध्यात्मिक तत्त्वांना सामाजिक मूल्यांची जोड दिली आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच संतांच्या भक्तितत्त्वाला “भोळ्या भावाचा व भावडेपणाचा विचार’ असे समजून भक्तित्त्वावर आघात केला जातो. संतांच्या विचारतत्त्वांचा खोलवर विचार न करता अध्यात्मवाद, भक्तीवाद असा शिक्का मारू त्यांच्या विचारात आणि चळवळीत धर्मसुधारणेची किंवा लोकजागृतीची भावना नाही. त्यांचा भक्तिमार्ग ही एक पळवाट आहे, असाही काहींचा आरोप आहे; परंतु हातात शस्त्र घेऊन उठाव करणे आणि कालची तत्त्वे पारंपारिक आहेत म्हणून लगेच परंपरेवर घाव घालून नवी पद्धत अवलंबिणे म्हणजे सुधारणावाद नव्हे. ऐहिक दु:खाचा व दैन्यांचा विसर पाडून मनुष्याला कोणत्या तरी काल्पनिक वातावरणांत गुंगवून संतांनी त्यांनी भोळ्या भावनेत गुंतवून ठेवले नाही, तर त्यांच्यातील जडत्व नाहीसे करून त्यांच्या जीवनात एक कार्यप्रवर्तक निष्ठा उत्तपन्न केली. विज्ञानाच्या अभावी बाह्यसृष्टीवर प्रभुत्व गाजविण्याची उमेद जोपर्यंत माणसामध्ये नव्हती तोपर्यंत त्यांच्या व्यक्तीविकासाला आध्यातिम्क अधिष्ठानाची नि:संशय गरज होती, म्हणून ज्ञानदेवादिकांनी महाराष्ट्रातील लक्षावक्षी लोकांच्या नि:सत्त्व जीवन क्रमाला अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. तेणे अबालसुबोधे। ओवियेचेनि प्रबंधे । ब्रह्मरस सुस्वादे । अक्षरे गुंथिली ।। त्यांच्याही जीवनात ब्रह्मरसाचा उत्कट आविष्कार घडविला. त्यांच्या नीरस जीवनात आनंद बहरू लागला. आपल्यातील सुप्त शक्तीची आणि भावनांची त्यांना जाणीव झाली आणि प्रतिकूल परिस्थितीलाही तोंड देण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली. नाथांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक तत्त्वचिंतनाचा फार मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगवाणीवर पडला आहे. समाजरीतीचे उत्कट दर्शन घेऊन ते उत्कटपणे आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करणारा पहिला संत म्हणजे संत एकनाथ तेच समाजदर्शन वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणारा संत म्हणजे तुकाबाराय, तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊन बाण फिरे ।। नाही भीडभाड । तुका म्हणे साना थोर ।। यासारख्या अनेक वचनांमधून त्यांच्याच अंतर्मनाचे उत्कट दर्शन घडते. आध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचारपंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्‌गार ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला, नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आहे. तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींवर फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वारस आकारला. बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणवोनि ।। किंवा बुडाली काढीत।बांधली सोडीत। साकडे फेडित । आर्ताचिया ।। हीच संतांची भूमिका होती. म्हणूनच ज्या कळवळ्याच्या भूमिकेतून त्यांनी समाजाकडे पाहिले तोच कळवळा त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झाला आहे. महाराष्ट्रीय संतांच्या पुढे मानवी जीवनाचे समग्र रूप उभे होते. म्हणूनच आपल्या आचार-विचारांना एकदेशियतेची बाधा होऊ दिली नाही. परंपरागत कर्मकांडातील लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवायचे होते. त्यासाठी लोकाभिमुख होऊन नव्हे रात्रंदिवस लोकातच वावरून बहुजन समाजाच्या अंतरंगात आणि बाह्यचारात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला अद्वैत आणि भक्ती, ज्ञान आणि उपासना, श्रद्धा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला आणि सामाजिक परिवर्तनासाठी विवेकनिष्ठेचा मार्ग सांगितला. कर्मपणा व व्रतवैकल्ये यावर झोड उठविली, पण स्वधर्मयज्ञाची महती कमी होऊ दिली नाही. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे…. एकांती लोकांती करू गदरोळ। लेश तेही मळ नाही येथे ।। एकांतात आणि लोकांतात असा गदारोळ उडवून दिला की मलिनतेची जळमटे आपोआप गळून पडली. संत चळवळीचे सामाजिक चिंतन करताना तत्कालीन महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर आणावे लागेल. तेराव्या शतकाच्या अखेरीच संतचळवळ सुरू झाली.दक्षिणेकडील यादवांच्या राजवाटीला ओहोटी लागली होती. इ.स. 1216 मध्ये अल्लाउद्दीनची स्वारी झाली आणि त्याने संपत्तीची प्रचंड लयलूट केली. यावरून राजघराण्याच्या अलोट ऐश्वयर्याची कल्पना येते. राजकाराभाराशी प्रत्यक्ष जोडला गेलेला सरदार जहागीरदार, वतनदार यांची आर्थिक स्थिती मजबूत होती, पण सामान्य वर्ग आर्थिक विवंचनेच्या खाईत लोटला गेला होता. युरोपाप्रमाणे महाराष्ट्रातही एक प्रकारची सरंजामशाही अवतरली होती. निरनिराळ्या वर्गाचे आर्थिक हितसंबंध जमिनीशी निगडीत होते. राजसंस्था, वतनसंस्था, ग्रामसंस्था यांचे लाभकेंद्र जमीन हेच होते. युरोपाप्रमाणे इथला शेतकरी भूमीहीन नव्हता. त्याच्या मालकीची थोडी होती; परंतु ती निसर्गावर अवलंबून असायची. जमीनीची अल्प उत्पादन शक्ती हेच सामाजिक दुरावस्थेचे मुख्यकारण होते. राजकारभारातील सरदार, जहागीरदार यांच्या मनमानी कारभाराची झळ शेतकऱ्यांना पोहोचली होती. नाथांच्या साहित्यातून या समाजस्थितीचे वर्णन होते. सामाजिक अस्थैर्याचा तो काळ होता. सत्तासंपादनासाठी सरदारांची आपापसात भांडणे होत. रयतेला लुटण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करीत. त्यामुळे गावगाड्यातील पाटील, शेटे, महाजन, चौगुले हा वर्गही त्यांना सामील होऊन गोरगरीबांना लुटत होता. पुंडाई आणि गुंडगिरी वाढली होती. ब्राह्मणवर्गाने कर्मठपणा वाढवला होता. क्षेत्रियांनी युद्धावर पळून येणे तर वैश्यावने शेतच्या शेत ओस पाडणे हा प्रकार चालला होता. ज्यांच्याकडे आशेने पहावे असा सर्वसंगपरित्याग करून परमार्थात आलेला बैरागी, साधू, जंगम, महानुभाव, फकीर, कलंदर हे स्वार्थासाठी दांभिक झाले होते. रडती पोटासाठी। झालो म्हणती सन्यासी। वर्म नकळे मूढा । होतो फणित रोकडा ।। यासारख्या एकनाथांच्या अभंगातून हे चित्र उभे राहते. अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यामुळे समाजाचे संतुलन बिघडले होते. विषयवासना बळावली होती. विकारांना आश्रय मिळाला होता. भक्ती वैराग्य बुडाले होते. दांभिकतेचे कौतुक होत होते. खरा धर्म, कर्म, नीती आणि आचार हे सारे लोपले होते. समाजातील दुष्ट प्रवृत्ती जोपर्यंत संपुष्टात येत नाहीत आणि सत्प्रवृत्ती जोपर्यंत वाढीस लागत नाही. तोपर्यंत समाजाला स्वास्थ्याची आशा नाही, हे नाथांनी ओळखले. एकीकडे वाढत चाललेली अवनती या दोन्ही गोष्टींमुळे संत एकनाथ हळहळले आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी त्यांनी “बये दार उघड’ म्हणून आदिशक्तीला आवाहन केले. थोडक्याकत सांगायचे तर भौतिक दुरावस्था आणि मानसिक गुलामगिरी यामुळे सामान्य जनता जड, मूढ व अगतिक बनली होती. या केविलवाण्या स्थितीतून तिला मुक्त करण्यासाठी संत चळवळ जन्माला आली. भक्तीपंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा आणि कर्तव्यप्रधान समाजजीवन यातून संतांच्या प्रबोधनकार्याची दिशा स्पष्ट झाली.कर्तव्याची चौकट भक्कम करूनच खऱ्या नीतीधर्माच्या उपदेशाने वैयक्तिक व सामाजिक जीवनसमर्थ करण्यासाठी संतांनी केलेला खटाटोप हा महाराष्ट्राच्या सामूहिक जीवनातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. सामाजिक भूमिकेतून संतकार्याचे मोठेपण मांडतांना ग. बा. सरदारांनी म्हटले आहे की,संत चळवळ ही सामाजिक लढ्यापासून लोकांना परावृत्त करणारी प्रतिगामी शक्ती नसून धार्मिक जीवनाच्या कक्षेत त्यांच्या हक्कासाठी सनदशीरपणे झगडणारी सुधारणावादी प्रवृत्तीच होती.’ संतांची ही लोकाभिमुख वृत्ती अध्यात्मा पुरतीच मर्यादित राहिली नाही.त्यांनी लोकसंस्थेचे मोठेपण ओळखले लोकजीवनाला सामाजिक नैतिकतेकडे नेणे हेच साध्य समजले आणि या लोकसंस्थेलानवचैतन्याचे वाहनबनविण्याची नवी दृष्ट दिली. हेच संत साहित्याचे सामाजिक योगदान म्हणावे लागेल. डॉ. रामचंद्र देखणे

2 comments:

  1. फारच छान व उद्बोधक
    अण्णा
    14/08/2020.

    ReplyDelete
  2. खुप अभ्यासपूर्ण माहिती

    ReplyDelete