स्वामी विवेकानंदांचा
जन्मदिन १२
जानेवारी, ‘युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. एकविसाव्या शतकात देशाचे भवितव्य बहुसंख्याक युवाशक्तीवर अवलंबून असेल, हे
स्वामींनी सव्वाशे वर्षांपूर्वी जाणले होते. म्हणूनच त्यांनी युवा पिढीला संस्कारित करण्याचे कार्य हाती घेतले होते. विवेकानंदांच्या तात्त्विक, धार्मिक, भूतदयावादी व
गूढ विचारांवर अनेक विद्वान लेखकांनी लिहिले. त्यांच्या सामाजिक, राजकीय व
राष्ट्रीय पुनरुत्थानावरील विचारांवर तुलनेने फारच थोडय़ांनी लिहिले आहे. स्वामींचे हे
देशभक्तीपर विचार विसाव्या शतकातील सुरुवातीच्या स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणास्रोत ठरलेत.
त्यांच्या निरीक्षणांनुसार भारतीय लोक इतर राष्ट्रांशी मिसळत नाहीत. त्यांच्या मानसिकतेनुसार ते
फक्त आपल्या प्राचीन वैभवाची
आणि आध्यात्मिक वारशाची जपणूक करतात. त्यांच्या मते हे
आपल्या संकुचिततेचे व
राष्ट्रीय अध:पतनाचे एक कारण आहे. आपल्या परिस्थितीची इतरांशी तुलना करून पाहण्याची संधी घेतली नाही. आपण कूपमंडूक विचारांनी पछाडलेलो होतो. म्हणून त्यांनी म्हटलंय, ‘‘परदेशगमनाशिवाय विकास नाही.’’
स्वामी विवेकानंदांनी भारतीय समाजाचा आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास बारकाईने केला होता. त्यांच्या निरीक्षणांनुसार जातीय व्यवस्था, अस्पृश्यता या
प्रथा विषमता आणि सामाजिक अन्यायाला कारणीभूत ठरत आहेत. त्यांच्या मुळावर आपण घाव घालू शकलो नाही तर
खरीखुरी सामाजिक प्रगती देशात होणे शक्य नाही. जातीयतेची समस्या ही
एक
राष्ट्रीय समस्या आहे त्यावर उपाय म्हणून आध्यात्मिक व
धर्मनिरपेक्ष ज्ञान प्रसृत करावे अशी त्यांची धारणा होती.
‘जन्म हा
नगण्य आहे, भोवतालची परिस्थितीच माणसाला घडवीत असते.’असे स्वामींनी जोरकसपणे निवेदिले होत. हर्बर्ट स्पेन्सर यांच्याकडून त्यांनी ही
उत्क्रांतीवादी कल्पना घेतली. म्हणूनच कोणतेही राष्ट्र, व्यक्ती, वर्ण, वर्ग यांना विशेषाधिकार असू नयेत, उच्च किंवा नीच दर्जा हा
माणसाच्या जन्म किंवा अनुवंशिकतेवरून नव्हे, तर
त्याची क्षमता आणि तो
करत असलेले कार्य यांवरून ठरला पाहिजे असे मांडावयास त्यांनी सुरुवात केली.
स्वातंत्र्य विकसित होण्याच्या मार्गात जे
सामाजिक कायदे, रूढी, परंपरा आड
येतात ते
हानिकारक आहेत. त्यांचा त्वरित नायनाट केला पाहिजे. स्वामींच्या राष्ट्रीय पुनरुत्थानाची शिकवण व
त्यांचे समाजविषयक विचार यांचा गाभा आपल्याला येथे दिसून येतो.
भारताच्या पुनरुत्थानाबाबत त्यांनी नमूद केलंय की,
‘बहुसंख्य जनतेकडे दुर्लक्ष करणे हे
पाप आहे. भारतातल्या बहुसंख्य सामान्यांना जोपर्यंत चांगले शिक्षण, अन्न व
स्वास्थ्य मिळत नाही तोपर्यंत कितीही राजकारण केले तरी त्याचा उपयोग होणार नाही.’’ पुढे ते
म्हणतात, ‘‘आमच्या शिक्षणासाठी जे
झळ
सोसतात, आमची देवळे ते
बांधून देतात, जे
प्रस्थापितांकडून दुर्लक्षिले जातात, त्या श्रमिकांसाठी आपण शिक्षितांनी कार्य केले पाहिजे.’’
‘‘तत्कालीन बहुजन समाज आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्षांत व्यग्र राहिल्यामुळे त्यांच्यात ज्ञानाचा उदय होऊ शकला नाही. यंत्राप्रमाणे काबाडकष्टाने त्यांनी समाजाच्या गरजा भागविल्या आहेत. पण
आता काळ बदलला आहे. खालच्या जातीतील लोकांना सत्याची जाणीव झाली. आणि एकत्रितपणे त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा केला. ही
जागृती झाल्याबद्दलच्या खुणा जगभर व
भारतातसुद्धा दिसू लागल्या आहेत. आता कितीही प्रयत्न केला तरी यापुढे खालच्या वर्गाना दडपून टाकणे वरिष्ठांना शक्य होणार नाही’’, असे स्वामींनी नमूद केले आहे.
स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल, मॅक्झिम गॉर्की यांसारख्या विद्वानांनी मांडलेल्या प्रगत आर्थिक व
राजकीय सिद्धांताचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळेच समस्यांच्या गाभ्याचे नेमके आकलन त्यांना झाले होते. मानवी समाजातील सर्व संपत्ती आणि संस्कृतीची इमारत श्रमिक वर्ग निर्माण करतात, परंतु त्यांच्या श्रमाच्या फलनिष्पत्तीपासून त्यांना वंचित ठेवले जाते. हाच त्या समस्येचा गाभा आहे. या
संदर्भातील विवेकानंदांच्या दृष्टिकोनामुळे श्रमाला एक
नवीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी म्हटलंय, ‘‘आपली श्रमजीवी जनता तिचे कर्तव्य पार पाडत आहे. जेव्हा बहुसंख्य लोक वाहवा करायला उपलब्ध असतात तेव्हा एखादा स्वार्थी मनुष्यदेखील नि:स्वार्थीपणे
वागतो, परंतु कुणीही दखल घेत नसताना, अगदी छोटय़ाशा कामात देखील जो
त्याच नि:स्वार्थीपणे
कर्तव्याला वाहून घेतो तो
श्रमिक धन्य होय.’’
वेदान्त संन्यासी असूनही आगामी परिवर्तनासंबंधी त्यांची ऐतिहासिक जाणीव किती स्पष्ट, तीक्ष्ण व
भेदक होती याचे प्रत्यंतर त्यांनी इ.
स.
१८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात लंडनहून आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रावरून सहज येऊ शकते. त्यांनी त्यात लिहिलंय-
‘‘मानवी समाजावर क्रमाने चार वर्णाचे शासन चालते. हे
चार वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे
होत. प्रत्येक वर्णाच्या शासनात काही चांगले गुण तर
काही दोष असतात. जेव्हा ब्राह्मणांचे राज्य असते, तेव्हा समाज वंशपरंपरेवर आधारलेला दृष्टीस पडतो. ब्राह्मणांचे व
त्यांच्या वंशजांचे अधिकार पूर्णपणे सुरक्षित राखले जातात. फक्त त्यांनाच ज्ञान संपादन करता येते आणि उपार्जित ज्ञानाचे दान करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो. विज्ञानाच्या
सर्व शाखांची पायाभरणी याच काळात होत असते, हे
या
काळाचे वैभव होय. ब्राह्मण वर्ग आपल्या मनाचा विकास करतो, कारण मनाच्या द्वारेच तो
इतरांवर शासन करीत असतो.
क्षत्रियांची राजवट ही जुलूम जबरदस्तीची आणि निष्ठुरतेची असते. परंतु ते
संकुचित स्वभावाचे नसतात आणि त्यांच्या राजवटीत कला आणि सामाजिक संस्कृती या
गोष्टींचा उत्कर्ष होतो.
त्यानंतर येते वैश्यांची राजवट. तिच्या ठायी प्रजाजनांना शांतपणे चिरडून टाकण्याचे व
त्यांचे रक्त शोषण करण्याचे सामथ्र्य असते, त्यामुळे ती
भयंकर असते. तिच्यापासून फायदा हा
की,
वैश्य हे
स्वत:च
सर्वत्र जात असल्यामुळे पूर्वीच्या दोन राजवटीत संकलित झालेल्या कल्पनांचा व
विचारांचा प्रसार करण्याचे कार्य ते
चांगल्या रीतीने करतात, वैश्य हे
क्षत्रियांपेक्षाही कमी संकुचित स्वभावाचे असतात. परंतु त्यांच्या राजवटीत संस्कृतीच्या अधोगतीला प्रारंभ होतो.
सरतेशेवटी शूद्रांची राजवट येईल, भौतिक सुखविलासांचा प्रसार हा
या
राजवटीचा फायदा होईल. संस्कृतीची अवनती (कदाचित) हा
तिच्यापासून तोटा होईल. सर्वसाधारण शिक्षणाचा फार प्रचंड प्रमाणात सर्वत्र फैलाव होईल हे
खरे. तथापि असाधारण प्रतिभावंतांची संख्या कमी कमीच होऊ लागेल.
ब्राह्मण काळातील ज्ञान-विज्ञान, क्षत्रिय काळातील संस्कृती, वैश्य काळातील प्रसारक प्रवृत्ती आणि शूद्र काळातील समतेचा आदर्श ही
सगळी गुणवैशिष्टय़े ज्या राज्यात शाबूत आहेत, परंतु त्यातील दोष जिथे नाहीत असे एखादे राज्य जरी निर्माण करता आले तरी ते
आदर्श राज्य ठरेल. परंतु ते
शक्य आहे काय?
तथापि पहिल्या तिघांची पाळी संपली आहे. आता शेवटच्यांची म्हणजे शूद्रांची पाळी आली आहे. त्यांची राजवट येईलच. तिला कोणी थोपवू शकणार नाही. ‘गोल्ड स्टँडर्ड’ (सुवर्णमान
पद्धती) आणि ‘सिल्व्हर स्टँडर्ड’ (रजतमान पद्धती) यांच्या संबंधीच्या खाचाखोचा मला ठाऊक नाही हे
खरे. तथापि या
‘गोल्ड स्टँडर्ड’मुळे गरीब लोक अधिकच गरीब आणि श्रीमंत लोक अधिकच श्रीमंत होत आहेत इतके मात्र मला दिसत आहे. ‘‘सुवर्णाच्या क्रूसावर मरण्यास आम्ही तयार नाही,’’ असे ब्रायनने म्हटले ते योग्यच होते, ‘सिल्व्हर स्टँडर्ड’मुळे गरिबाला अधिक चांगली संधी मिळेल. समाजवादही परिपूर्ण वा
निर्दोष पद्धती आहे म्हणून मी
समाजवादी आहे असे मुळीच नव्हे, तर
दगडापेक्षा वीट मऊ
या
दृष्टीनेच मी
समाजवादी आहे’’, असे स्वामींनी नमूद केले आहे.
‘‘इतर सर्व शासन पद्धतींचे प्रयोग झालेले असून त्या त्या शासनपद्धती सदोष असल्याचे आढळून आले आहे. आता या
पद्धतीचा प्रयोग करून पाहावा- दुसऱ्या कशासाठी म्हणून नसला तरी प्रयोग करून पाहावा. त्याच त्याच माणसांनी पुन: पुन्हा सुखदु:खांचा अनुभव घेण्याऐवजी सुखदु:खांची नव्याने वाटणी होणे जास्त चांगले. जगातल्या चांगल्या वाईटांची गोळाबेरीज नेहमी कायमच राहते. नव्या शासनपद्धतीमुळे जोखडाची खांदेपालट होईल, इतकेच.’’
स्वामी विवेकानंदांची उपरोक्त भाष्ये व
भाकिते सहजपणे किंवा उथळपणे केलेली नसून दीर्घकाळ भारतात आणि परदेशात निरीक्षण व
सखोल चिंतन करून केलेली आहेत, हे
लक्षात घेण्याजोगे आहे.
स्वामी विवेकानंदांनी वर्तविलेल्या भाकितांनुसार वानगीदाखल जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रत्यक्षात घडलेल्या काही घटना नमूद करण्यासारख्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
डॉ.
नेल्सन मंडेला यांच्यापासून खालच्या वर्गाची शासनव्यवस्था उदयास आली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत नागरिकांनी आफ्रिकन वंशाचे कृष्णवर्णीय श्री. बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. आपल्याकडे दलित समाजातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ.
बाबासाहेब आंबेडकर व
बाबू जगजीवनराम यांचा समावेश करण्यात आला होता. दलित समाजातील श्री .नारायणन यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते. श्रीमती मायावती या
दलित महिलेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे.
या
शिवाय देशात स्वातंत्र्योत्तर परिस्थिती बदलली नि
बहुजन आणि खालच्या जातीतील लोकांनी आपापले उन्नयन करून अनेक शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व
प्रशासकीय कार्यातून देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योगदान करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
(संदर्भ : ‘अग्नीमंत्र’ विवेकानंदांच्या पत्रांचे संकलन, २००३ नागपूर मठ,
‘विवेकानंदांचे सामाजिक-राजकीय विचार’ विनयकुमार रॉय, लोकवाङ्मयगृह)
lokprabha@expressindia.com
|
|
No comments:
Post a Comment